मिंत्रानो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, महाराष्ट्र जेव्हा कधी तुम्ही उच्चारता तेव्हा तुमच्या समोर कोणाची प्रतिमा उभी राहते?
नक्कीच, तूमच उत्तर छत्रपती शिवाजी महाराज हेच असेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र हे जणू काही एकाच धाग्यात विणल्यासारखं आहे. तथापि असे म्हणता येईल की shivaji maharaj हे महाराष्ट्राचे ( मराठी लोकांचे ) आराध्य दैवत आहेत .
मित्रांनो मराठी लोकांच्या धमन्यांमधील वाहणाऱ्या रक्तातील प्रत्येक थेंब हा महाराजांसाठी वाहत असतो, कारण मराठी लोकांच्या सम्मान, स्वाभिमान, अस्तित्वासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ( आजचा महाराष्ट्र ) स्थापना केली. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा देखील म्हटल्या जाते.
तेव्हा मित्रांनो तुम्ही एकदा महाराज्यांचा नावाचा जयघोष होऊ द्या . बोला ………
प्रौढ प्रताप पुरंदर . . .|| क्षत्रीय कुलावंतस् . . . || सिंहासनाधिश्वर . . . .|| महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
पहा आले न तुमच्या अंगावर काटे. हे दर्शविते की तुम्ही मराठी आहात.
![shivaji maharaj
shivaji maharaj photo
indian rular
swarajyache sansthapak](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/शिवाजी-महाराज.jpg?resize=650%2C450&ssl=1)
शिवाजी महाराजांची माहिती | Shivaji Maharaj Information
शिवाजी महाराज यांचा जन्म त्याकाळातील निजामशाहीतील महत्वाचे सरदार (जहागीरदार) असलेले शहाजीराजे भोसले यांच्या कुटुंबात झाला. त्याकाळी शहाजीराजे यांच्याकडे पुण्याची जहागीरदारी होती. शहाजीराजे यांचे लग्न सिंदखेड्याचे जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी 1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या झाला. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ’’शिवाजी’’ नामकरण करण्यात आले.
महाराजांना राज्यशासनाचे आणि युद्ध कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडून मिळाले. अगदी लहानपणापासून राम आणि कृष्णाच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.
जिजाबाई महाराजांना राम कृष्णाच्या, शुरविरांच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर उत्तम संस्कार तर करतच होत्या त्या शिवाय तलवारबाजी, घोडयावर स्वार होणे यात त्यांना तरबेज करत होत्या.
पहिली गुरू आई आणि दुसरे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात आणि संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले.
मुघल साम्राज्य आपल्यावर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली. आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी उचलला.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या सभेमद्ये आणि संसदेमद्ये शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील कल्पना मांडतांना आपल्याला पाहावयास मिळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ | Shivaji Maharaj Family Tree
- शहाजी भोसले- शिवाजी महाराजांचे वडील
- राजमाता जिजाबाई – शिवाजी महाराज यांच्या आई
छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू
- राजे संभाजी शहाजी भोसले (सख्खे) (जिजाबाई)
- राजे व्यंकोजी (एकोजी) शहाजी भोसले (सावत्र) (तुकाबाई)
- संताजी
![chatrapati shivaji maharaj family tree diagram](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/Add-a-heading-1.jpg?resize=840%2C402&ssl=1)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी
- सईबाई : संभाजी महाराज, राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई
- सोयराबाई : राजाराम महाराज आणि दीपाबाई
- पुतळाबाई
- सकवारबाई : कमलाबाई
- काशीबाई
- सगुणाबाई : राजकुवरबाई
- लक्ष्मीबाई
- गुणवंताबाई
शिवाजी महाराजांचे मुले/मुली:
- धर्मवीर छत्रपती संभाजी राजे – सईबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा.
- छत्रपती राजाराम – सोयराबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा .
- सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई – शिवाजी महाराज व सईबाई यांच्या ३ मुली.
- दीपाबाई – सोयराबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
- राजकुंवरबाई – सगुणाबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
- कमलाबाई – सकवार बाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
शिवाजी महाराजांची नातवंडे:
- शाहू महाराज (सातारा)- राणी येसूबाई व छत्रपती संभाजी राजे यांचा मुलगा.
- शिवाजी महाराज दुसरे (कोल्हापूर)- राणी ताराबाई व छत्रपती राजाराम यांचा मुलगा.
- संभाजी महाराज – राणी राजसबाई व छत्रपती राजाराम यांचा मुलगा
शिवाजी महाराजांचे पंतू:
- शिवाजी महाराज तिसरे
- रामराजा
छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील महत्वाच्या घटना. ( इम्पॉर्टन्ट ).
मराठी सत्तेचा उदय | Rise of Maratha Empire
![rise of maratha empire
maratha empire
shivaji maharaj is the ounder of maratha empire](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/मराठी-सत्तेचा-उदय.jpg?resize=750%2C480&ssl=1)
जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे
राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य
JAI SHIVAJI
छत्रपतींचे असामान्य कर्तृत्व
इ. स. च्या सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठी सत्तेची झालेली स्थापना ही प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत स्फूर्तिदायक व अभिमानास्पद घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली आणि या ठिकाणच्या सामान्य मावळ्यांच्या अंत:करणात स्वातंत्र्याचा स्फुलिंग निर्माण केला. छत्रपतींनी सर्वसामान्य मराठी माणसात स्वाभिमान जागृत करून त्याला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा याकरिता लढण्याची प्रेरणा दिली.
पुणे जहागिरीची जबाबदारी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इ. स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे सुरुवातीला निजामशाहीच्या सेवेत होते. निजामशाहीचा अस्त झाल्यावर ते विजापूरच्या आदिलशहाच्या सेवेत रुजू झाले. शहाजी राजे त्या काळातील अत्यंत पराक्रमी व कर्तृत्ववान मराठा सरदार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी निजामशाहीच्या अखेरच्या काळात स्वकर्तृत्वावर निजामशाही टिकवून धरण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आदिलशाहीच्या सेवेत गेल्यावर तेथेही त्यांनी असाच पराक्रम गाजविला होता. शहाजी राजे आदिलशाहीकडे गेल्यावर त्यांना कर्नाटकात रहावे लागले; त्यामुळे आपल्या पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी आपली पत्नी जिजाबाई व मुलगा शिवाजी यांना पुणे येथे ठेवले; त्यामुळे शिवाजी महाराजांचे बालपण पुण्याच्या परिसरातच व्यतीत झाले आणि त्याच परिसरात त्याच्या कर्तृत्वालाही बहर आला.
स्वराज्याचे तोरण
![torana killa is the first fort win by shivaji maharaj](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/शिवाजी-महाराज-2.jpg?resize=650%2C450&ssl=1)
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६४६ च्या सुमारास म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. छत्रपती सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळावी हीच खरोखर अभूतपूर्व होती. विशेषत: मराठा सरदार मुस्लिम राज्यकर्त्यांची सेवाचाकरी करण्यात धन्यता मानत असताना आणि जहागिऱ्या व वतने मिळविण्यात आपले कर्तृत्व खर्ची घालत असताना एका मराठा युवकाच्या मनात आपणच राज्यकर्ता बनण्याचा विचार यावा ही आश्चर्याची बाब होती; परंतु यातच शिवाजी महाराजांचे असामान्यत्व प्रत्ययास येत होते. जो विचार भल्याभल्या मराठा सरदारांच्या मनाला शिवलादेखील नव्हता तो विचार छत्रपतींनी कृतीत आणून दाखविला.
शिवरायांच्या जीवनातील काही ठळक घटना
महाराष्ट्रच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा आपण घेत आहोत; त्यामुळे शिवकालीन इतिहासाच्या
या तपशिलात आपणास जाता येत नाही. तथापि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती घेणे आवश्यक ठरते.
![shivaji maharaj was born in16 feb 1630
in shivneri fort](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/शिवाजी-महाराज-1.jpg?resize=650%2C450&ssl=1)
शिवजन्म | Birth of shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्हातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. काही इतिहासकारांच्या मते महाराजांचा जन्म १६२७ मध्ये झाला; परंतु १९ फेब्रुवारी, १६३० हाच त्यांचा जन्मदिवस आहे, यावर आता बहुतेक इतिहासकारांचे एकमत झाले आहे.
स्वराज्याची स्थापना | swarajya establishment
शिवाजी महाराजांनी इ. स. १६४६ च्या सुमारास तोरणा किल्ला सर करून स्वराज्याचे तोरण बांधले…
जावळी विजय
जावळीचे चंद्रराव मोरे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार होते. त्या काळातील एक मातब्बर घराणे म्हणून मोरे घराण्याकडे पाहिले जात होते. चंद्रराव मोरे स्वराज्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा बनून राहिला होता. शिवाजी महाराजांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु चंद्ररावाने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली; त्यामुळे महाराजांनी १६५६ मध्ये जावळीवर स्वारी करून मोऱ्यांचा पराभव केला आणि जावळी काबीज केली. या वेळी महाराजांनी रायगड किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. तसेच जावळीपासून जवळच एका मोक्याच्या जागेवर प्रतापगड किल्ला बांधला.
शिवाजी अफजल खान भेट | shivaji afjal khan bhet
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर अल्पावधीतच बराचसा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला. महाराष्ट्रातील छत्रपतींचा वाढता प्रभाव पाहून विजापूरकर आदिलशहाला धडकी भरली. शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे असे त्याला वाटले. त्याकरिता त्याने आपला एक मातब्बर सरदार अफजलखान याला मोठ्या फौजफाट्यानिशी महाराष्ट्रात रवाना केले. इ. स. १६५९ मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी व अफजलखान यांची भेट झाली.
![meeting of shivaji maharaj and afzal khan set in foothills of pratapgarh](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/www.mahajatra.com_-1.jpg?resize=750%2C480&ssl=1)
या वेळी अफजलखानाने विश्वासघाताने महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला; परंतु अफजलखानाच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असल्याने महाराजांनीही आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली होती. अफजलखानाने वार केल्यावर महाराजांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढविला आणि त्याला ठार केले. त्यानंतर मराठ्यांच्या सैन्याने बेसावध असलल्या खानाच्या फौजेवर अकस्मात हल्ला करून जावळीच्या खोऱ्यात खानाच्या फौजेची धुळधाण उडविली.
पन्हाळगडावरून सुटका
इ. स. १६६० मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने अकस्मात गडाला वेढा घातला; त्यामुळे महाराज शत्रूच्या वेढ्यात अडकून पडले. शत्रूला शरण जाण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही असेच यावेळी सर्वांना वाटले; परंतु १२ जुलै, १६६० च्या राजी शत्रूला मुळीच थांगपत्ता न लागू देता महाराज अगदी मोजक्या सैनिकांनिशी गुप्तपणे किल्ल्यातून बाहेर पडले आणि शत्रूच्या वेढ्यातून स्वत:ची आश्चर्यकारकरीत्या सुटका करून घेतली.
शिवाजी महाराज किल्ल्यातून निसटल्याचे थोड्या वेळाने सिद्दी जोहरच्या लक्षात आले. त्याने विशाळगडच्या दिशेने महाराजांचा पाठलाग सुरू केला. या प्रसंगी विशाळगडपासून जवळच असलेल्या पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे याने शत्रूला रोखून धरले. शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याची खात्री पटल्यावरच या स्वामिनिष्ठ सेवकाने आपले प्राण सोडले.
शाहिस्तेखानाला अद्दल | shahistekhan and shivaji maharaj
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य मोगल बादशहाच्याही डोळ्यात खुपू लागले होते. स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपला मामा आणि एक बलाढ्य सरदार शाहिस्तेखान यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने मोठ्या जिकिरीने चाकणचा किल्ला कसाबसा जिंकला. त्यानंतर त्याने पुण्यातच तळ ठोकला आणि महाराजांच्या लाल महालात वास्तव्यास राहिला.
![image of shivaji maharaj attacking saiste khan](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/www.mahajatra.com-1-1.jpg?resize=750%2C480&ssl=1)
शाहिस्तखानाला अद्दल घडविण्यासाठी आणि त्याला मराठ्यांचे पाणी दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांनी इ. स. १६६३ मध्ये एका रात्री अकस्मात थेट शाहिस्तेखानाच्या मुक्कामाच्या ठिकाणावर धडक मारली. रात्रीच्या अंधारात महाराजांनी शाहिस्तेखानावर वार केला खरा, पण खानाच्या जिवावर बेतले होते ते फक्त बोटांवरच निभावले. या
शाहिस्तेखानाने महाराजाची मोठी धास्ती घेतली. त्याने लगोलग आपला पुण्यातील मुक्काम हलविला.
सुरतेची पहिली लूट
सुरत शहर त्या काळात देशातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्धी पावले होते. हे शहर मोगलांच्या ताब्यात होते. इ. स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी अकस्मात सुरतेवर हल्ला केला आणि त्या शहराची लूट केली; परंतु लुटीच्या वेळीही सामान्य लोकांना उपद्रव होणार नाही याची काळजी घेण्यासंबंधी सक्त ताकीद त्यांनी आपल्या सैनिकांना दिली होती. इ. स. १६६४ मध्येच महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा मृत्यू झाला.
मिर्झाराजा जयसिंगाची स्वारी
मराठ्यांच्या वाढत्या सामर्थ्याची धास्ती घेतलेल्या औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झराजा जयसिंग याला प्रचंड फौजफाट्यानिशी महाराष्ट्रात रवाना केले (इ. स. १६६५). जयसिंगने स्वराज्यात आल्यावर दिलेरखान या सरदारला पुरंदर किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले. दिलेरखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला, परंतु मराठ्यांनी त्याला लवकर दाद दिली नाही. अखेरीस मोगलांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून किल्ला जिंकून घेतला. या वेळी मराठ्यांचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे याने अतुलनीय पराक्रम गाजविला.
पुरंदरचा तह
मिाराजा जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर मोठेच संकट कोसळले होते. यातून मार्ग काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोगलांशी तह करण्याची तयारी दाखविली. त्यानुसार जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. या तहान्वये महाराजांनी आपले काही किल्ले मोगलांच्या ताब्यात दिले. तसेच त्यांनी उत्तरेत जाऊन औरंगजेबाची भेट घेण्याची तयारी दाखविली.
औरंगजेब भेट व आग्र्याहून सुटका | shivaji aurangjeb bhet
पुरंदरच्या तहाने ठरल्यानुसार शिवाजी महाराज आपला नऊ वर्षांचा पुत्र संभाजी याच्यासमवेत इ. स. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तर भारतात गेले. औरंगजेबाने या वेळी आपला दरबार आग्रा येथे भरविला होता. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले खरे, पण औरंगजेबाने त्यांना ज्या प्रकारची वागणूक दिली ती पाहिल्यावर महाराजांनी भर दरबारातच आपला संताप व्यक्त केला आणि बादशहाकडे पाठ फिरवून ते रागारागाने दरबारातून बाहेर पडले. त्यानंतर औरंगजेबाने महाराजांना आग्र्यातच नजरकैदेत ठेवले आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाभोवती कडक पहारा बसविला; परंतु शिवाजी महाराजांनी अशा प्रकारच्या कडेकोट बदोबस्तातूनही मोठ्या युक्तीने आपली सुटका करून घेतली आणि ते सुखरूप महाराष्ट्रात परतले.
सिंहगड स्वराज्यात सामील | Tanaji malusare bravery
पुरंदरच्या तहाने जे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले त्यामध्ये सिंहगडचाही समावेश होता. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी आपला अत्यंत विश्वासू सहकारी तानाजी मालुसरे याच्यावर सिंहगड जिंकन कामगिरी सोपविली. तानाजीने आपल्या प्राणांची आहुती देऊन हा किल्ला मोगलांकडून परत मिळविला. त्यानंतर महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेले किल्ले एएकापाठोपाठ एक असे स्वराज्यात सामील करून घेतले.
सुरतेची दुसरी लूट
इ. स. १६७० मध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत शहराची लूट केली. औरंगजेबाने महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी त्यांना कैदेत ठेवले होते. सुरतेची दुसरी लूट हे महाराजांनी औरंगजेबला दिलेले उत्तर होते.
राज्याभिषेक
मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद व वैभवशाली घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महराजांचा राज्याभिषेक (इ. स. १६७४) होय. मराठ्यांचे राज्य हे सार्वभौम राज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महराज हे सार्वभौम राजे आहेत याची ग्वाही या राज्याभिषेकाने दिली. महाराजांच्या सार्वभौमत्वाला तत्कालीन बहुतेक सर्व सत्तांनी मान्यता दिली होती.
![The Rajyabhishek ceremony (coronation) of Shivaji Maharaj was performed on June 6, 1674 at Raigad](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/www.mahajatra.com-3.jpg?resize=750%2C480&ssl=1)
शिवाजी महाराज यांचे सिंहासन
६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. यावेळी ३२ मन सुवर्ण सिंहासन घडविण्यात आले. राजे त्या सिंहासनावर विराजमान झाले. परंतु आता ते सिंहासन कुठे आहे याबद्दल कुठलीही ठोस माहिती सापडत नाही. येणाऱ्या काही वर्षांत शिवप्रेमी महाराजांचे तसलेच ३२ मन सुवर्ण सिंहासन रायगडावर उभारणार असल्याची माहिती मिळते. (इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)
(राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसांत राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू झाला.)
कर्नाटक मोहीम
दक्षिण भारतात स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी इ. स. १६७७-७८ मध्ये कर्नाटकात मोहीम काढली. या मोहिमेत त्यानी अनेक नेत्रदीपक विजय मिळविले आणि नवे प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतले. या वेळी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने आपल्या राजधानीत महाराजांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांचा मानसन्मान केला. यावरून त्या वेळचे इतर राज्यकर्ते महाराजांना किती मान देत होते हे स्पष्ट होते.
देहावसान | death of shivaji maharaj
इ. स. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे रायगडावर वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी देहावसान झाले.
शिवाजी महाराजांचे कर्तबगार मित्र मंडळी तसेच मावळे
दादोजी कोंडदेव, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बहिरजी नाईक
सरनोबत नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, संभाजी कावजी, बाजी पासलकर, किंदाजी फरझंद, जीवा महाल
मुरारबाजी देशपांडे, गणोजी शिर्के
याशिवाय असंख्य मराठी माणसे शिवरायांच्या सोबत हो
महाराजांना अनेक निष्ठावान आणि कर्तबगार सैन्याची साथ मिळाली होती. यातील काही महाराजांचे बालपणापासूनचे मित्र तर काहीजण शहाजीराजे यांच्या सैन्यातील होते.
शिवाजी महाराजांचे किल्ले
![shivaji maharajenche kille to solidified the swaraj](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/सिंधुदुर्ग.jpg?resize=840%2C630&ssl=1)
छत्रपतींना स्वराज्य स्थापण्याकरिता किल्यांचे महत्व फार पूर्वीच कळले होते, या गोष्टीची जाणीव असल्यामुळेच वयाच्या अवघ्या १५ वर्षी आपल्या मित्रांच्या सोबतीने तोरणा, कोंढाणा,आणि चाकण स्वतःच्या ताब्यात घेतले.आबाजी सोनदेवांच्या मदतीने मुल्ला अहमदच्या ताब्यात असलेले ठाणे, कल्याण आणि भिवंडीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसु लागले . . . महाराजांवर लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी बनविण्यात आले . . . . पुढे जवळ जवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही.
तो काळ त्यांनी त्यांची सेना (संख्याबळ) वाढवण्यात आणि इतरांसोबत संबध दृढ करण्यावर खर्च केला.
माहिती नुसार शिवाजी महाराजांनी सुमारे ३०० हून अधिक किल्ले जिंकलेले आहेत त्यापैकी शिवनेरी किल्ला, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, लोहगड, सिंहगड, प्रबलगड, स्वर्णदुर्ग यां सारखे असंख्य किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरता जिंकले आहेत. आणि जवळपास महाराजांनी जवळपास १११ किल्ले बांधले होते, असा उल्लेख एका बखरी मध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी
आपल्याला आज शिवाजी महाराजांची समाधी .रायगडावर बघायला मिळते. अखंड महाराष्ट्रातून शिवप्रेमी रायगडावर शिवरायांच्या समाधी तीर्थाच्या दर्शनासाठी येत असतात.
महात्मा जोतिबा फुले यांनीच (प्रथम) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली.समाधीवरच्या काट्या , कुरटे काढून, त्या ठिकाणाची साफ सफाई करून जोतीबांनी समाधीचे पूजन केले, आणि नंतर शिवरायांच्या जीवनावर पोवाडा रचला.
छत्रपती शिवाजी महाराजांची गुण वैशिष्ट्ये
आज्ञाधारी पुत्र : मासाहेब जिजाऊंची स्वराज्य स्थापनेची आज्ञा महाराजांनी पूर्ण केली.
मुत्सद्दी राजकारणी
कुशाग्र बुद्धिमत्ता : महाराजांनी अनेक युद्धे ही गनिमी काव्याने जिंकली आहेत. ‘शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण येथे योग्य ठरते.
कुशल योद्धा : ते युद्धकलेत अत्यंत कुशल होते
जाणता राजा : महाराजांना आपल्या प्रजेची काळजी होती (imp)
शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे
पोवाडा म्हणजे महाराष्ट्रातील पारंपारिक संगीतनृत्य प्रकार. यामध्ये अनेक ऐतिहासिक घटनांवर काव्यपंक्ती तयार करून प्रकाश टाकला जातो. पोवाडा गाणाऱ्याला शाहीर असे म्हणतात. महाराजांच्या जीवनावर अनेक पोवाडे प्रसिद्ध आहेत.
महात्मा जोतिबा फुले यांनी प्रथम (पहिल्यांदा) शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला.
अफझल खानाचा वध, कोंढाणा किल्ला, शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग आणि अनेक मोहिमांवरील पोवाडे सुद्धा लिहिले गेलेले आहेत. हे पोवाडे ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. यांपैकी काही पोवाडे तर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील घेण्यात आलेले आहेत.
चित्रपटांमधील काही प्रसिद्ध पोवाडे
- अफझल खानाचा वध : चित्रपट (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
- तान्हाजी मालुसरे : चित्रपट (तान्हाजी)
- कोंढाणा मोहीम : चित्रपट (बाळकडू) इ
Shivaji Maharaj Rajmudra
![प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/www.mahajatra.com-2.jpg?resize=750%2C480&ssl=1)
सर्वधर्म समभाव मानणारे राजे उत्तम प्रशासक द्रष्टा नेता स्त्रियांचा सन्मान आणि रक्षा एकजुटीने कार्य करणे: महाराजांनी अनेक जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केलेली आहे
Stamp of Shivaji maharaj
![indian government publish stamp of shivaji maharaj for india post](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/04/Untitled-design.jpg?resize=450%2C600&ssl=1)
शिवाजी महाराजांचे गुरु कोण | Who is the guru of shivaji maharaj ?
शिवाजी महाराजांचे गुरु कोण या प्रश्नाचे उत्तर घेण्याचे प्रयत्न करूया
मित्रांनो, शिवाजी महाराजांचे गुरु कोण ? हा सदैव चर्चेचा विषय ठरलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या माहितीनुसार किंवा मान्यतेनुसार देत असतो. जसे की काहींच्या मते रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव तर बहुतांशी लोक संत तुकाराम यांना शिवाजी महाराज यांचे गुरु मानतात.
मित्रांनो खर तर इतिहासात याचे पुरावे मिळत नाही. शिवाजी महाराज यांनी कुणाचाही गुरु म्हणून उल्लेख केलेला नाही त्याचबरोबर
रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव आणि संत तुकाराम यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा शिष्य म्हणून उल्लेख केल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाही.
परंतु या तिन्ही जणांचा कधी न कधी शिवरायांशी संपर्क झालेला बघायला मिळतो.
दादोजी कोंडदेव पुणे जहागिरीमध्ये कामाला होते,
संत तुकाराम यांचा शिवरायांवर इतका प्रभाव होता की स्वतः त्यांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली.
रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांवर अलंकारीत भाषेमध्ये कविता लिहून शिवरायांची स्तुती केली आहे.
मित्रांनो वरील विश्लेषणाच्या आधारे तिघांनाही शिवाजी महाराजांचे गुरु म्हणता येणार नाही.
शिवाजी महाराजांचे गुरु कोण या ;प्रश्नाचे उत्तर काय बार असेल, जर तुम्ही ही पोस्ट नीट वाचली तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येते की
लहानपणापासून आई जिजाई यांनी शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. शिवाजीराजांना चांगलं शिक्षण मिळण्याची सोय केली, शिवराय शहाजी राज़े यांचे पुत्र होते, त्यामुळे ते निसर्गतः युद्धकौशल्य आणि राजकीय कौशल्य यांच्यात ते निष्णात झाले.
प्रामुख्याने लक्षात येणारी बाब म्हणजे शिवाजी महाराज माणसे ओळखण्यात प्रभावी होते. त्यामुळे त्यांनी काही मावळ्यांच्या मदतीने वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.
आई जिजाई यांनाच शिवरायांचं गुरु म्हणणं योग्य राहील. कारण शिवाजी राजांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
मित्रांनो शिवाजी महाराजांना स्वयंभू म्हणणं योग्य राहील. त्यांनी स्वराज्य स्वतःच्या जिद्दीनं तयार केलं.आणि मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, मराठी भाषा, मराठी संस्कृती , मराठी लोकांचे हित स्वराज्याचे भाग केले. मराठी लोक शिवरायांना छत्रपती म्हणतात. शिवरायांना जाणता राजा देखील म्हणतात.
|| जय शिवराय ||